45 - Al-Jaathiya ()

|

(1) १. हा. मीम

(2) २. हा ग्रंथ, जबरदस्त हिकमत (बुद्धिकौशल्य) बाळगणाऱ्या अल्लाहतर्फे अवतरित झाला आहे.

(3) ३. आकाशांमध्ये आणि धरतीत ईमान राखणाऱ्यांकरिता अनेक निशाण्या आहेत.

(4) ४. आणि स्वतः तुमच्या जन्मात आणि जनावरांच्या पसरविण्यात, विश्वास ठेवणाऱ्या जनसमूहाकरिता अनेक निशाण्या (बोधचिन्हे) आहेत.

(5) ५. आणि रात्र व दिवसाच्या फेरबदलात आणि जी काही आजिविका (रोजी) अल्लाह, आकाशातून अवतरित करून जमिनीला, तिच्या मृत्युनंतर (पुन्हा) जिवंत करतो, त्यात आणि वाऱ्यांच्या फेरबदलातही, त्या लोकांकरिता निशाण्या आहेत, जे बुद्धी बाळगतात.

(6) ६. या आहेत अल्लाहच्या आयती, ज्या आम्ही तुम्हाला सत्यासह ऐकवित आहोत, तेव्हा अल्लाह आणि त्याच्या आयतीनंतर हे (अखेर) कोणत्या गोष्टीवर ईमान राखतील?

(7) ७. धिःक्कार (आणि खेद आहे) प्रत्येक खोट्या अपराधीबाबत.

(8) ८. अल्लाहच्या आयती आपल्यासमोर वाचल्या जात असताना जो ऐकेल, तरीही गर्व करील अशा प्रकारे अडून राहावा, जणू त्याने ऐकलेच नाही, तर अशा लोकांना दुःखदायक शिक्षेची खबर द्या.

(9) ९. आणि जेव्हा तो आमच्या आयतींपैकी एखाद्या आयतीची खबर मिळवितो तेव्हा तिची थट्टा उडवितो. हेच ते लोक होत, ज्यांच्याकरिता अपमानदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.

(10) १०. त्यांच्या मागे जहन्नम आहे, जे काही त्यांनी साध्य केले होते, ते त्यांना काहीच उपयोगी पडणार नाही आणि ना ते (काही उपयोगी पडतील) ज्यांना त्यांनी अल्लाहखेरीज वली (संरक्षक, मित्र) बनवून ठेवले होते. त्यांच्यासाठी तर मोठा भयंंकर अज़ाब आहे.

(11) ११. हे (परिपूर्ण) मार्गदर्शन आहे,१ आणि ज्या लोकांनी आपल्या पालनकर्त्याच्या आयतींचा इन्कार केला, त्यांच्यासाठी मोठी कठीण शिक्षा - यातना आहे.
(१) कधी हवेची दिशा उत्तर आणि दक्षिणेकडे तर कधी पूर्व आणि पश्चिमेकडे असते. कधी पाणी पाऊस आणणारी हवा तर कधी भूभागावरील हवा, कधी रात्री तर कधी दिवसा, काही हानिकारक तर काही लाभदायक, काही आत्म्यास पोषक तर काही, सर्व काही होरपळून टाकणारी आणि केवळ धूलमिश्रित वादळ. हवेचे एवढे प्रकार हे सिद्ध करतात की या विश्वाचा कोणीतरी कर्ता करविता आहे जो केवळ एकमेव आहे, दोन किंवा अधिक नाही. समस्त अधिकारांचा स्वामी तोच एकटा आहे. त्याचा कोणी भागीदार नाही. प्रत्येक प्रकारची व्यवस्था तोच एकटा सांभाळतो. दुसऱ्या कोणाच्याही जवळ कणाइतकाही अधिकार नाही. याच अर्थाची आयत ‘सूरह बकरा’ची आयत नं. १६४ देखील आहे.

(12) १२. अल्लाहच आहे ज्याने तुमच्यासाठी समुद्राला ताबेदार बनविले, यासाठी की त्याच्या आदेशाने त्यात नौका चालाव्यात आणि तुम्ही त्याच्या कृपेचा शोध घ्यावा आणि यासाठी की तुम्ही त्याच्याशी कृतज्ञ व्हावे.

(13) १३. आणि आकाशांच्या व धरतीच्या प्रत्येक वस्तूलाही त्याने आपल्यातर्फे तुमच्या सेवेत लावून ठेवले आहे, निःसंशय, विचार-चिंतन करणाऱ्या लोकांना यात अनेक निशाण्या आढळून येतील.

(14) १४. तुम्ही ईमान राखणाऱ्यांना सांगा की त्यांनी अशा लोकांना माफ करत राहावे, जे अल्लाहच्या दिवसांची आशा बाळगत नाही, यासाठी की सर्वश्रेष्ठ अल्लाहने एका जनमसूहाच्या लोकांना त्यांच्या दुष्कृत्यांचा मोबदला द्यावा.

(15) १५. जो कोणी सत्कर्म करील तो आपल्या स्वतःच्या भल्याकरिता आणि जो दुष्कर्म करील, त्याची दुष्परिणती त्याच्यावरच आहे. मग तुम्ही सर्व आपल्या पालनकर्त्याकडे परतविले जाल.

(16) १६. आणि निःसंशय, आम्ही इस्राईलच्या संततीला ग्रंथ, राज्यसत्ता आणि पैगंबरपद प्रदान केले होते, आणि आम्ही त्यांना पाक (स्वच्छ - शुद्ध) व चांगली रोजी (आजिविका) प्रदान केली होती, आणि त्यांना जगातील लोकांवर श्रेष्ठता प्रदान केली होती.

(17) १७. आणि आम्ही त्यांना धर्माच्या स्पष्ट निशाण्या प्रदान केल्या, मग त्यांनी आपल्याजवळ ज्ञान येऊन पोहोचल्यानंतर आपसातील द्वेष-विवादापायी मतभेद केला. हे ज्या ज्या गोष्टीत मतभेद करीत आहेत त्यांचा फैसला कयामतच्या दिवशी त्यांच्या दरम्यान तुमचा पालनकर्ता स्वतः करील.

(18) १८. मग आम्ही तुम्हाला धर्माच्या (स्पष्ट) मार्गावर कायम केले. तेव्हा तुम्ही त्याच मार्गाचे अनुसरण करीत राहा आणि नादान अडाणी लोकांच्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण करू नका.

(19) १९. (लक्षात ठेवा) की हे लोक कधीही अल्लाहसमोर तुमच्या काहीच कामी येऊ शकत नाही (जाणून घ्या की) अत्याचारी लोक आपसात एकमेकांचे मित्र असतात आणि अल्लाहचे भय राखणाऱ्यांचा सखा - सोबती, महान अल्लाह आहे.

(20) २०. हा कुरआन लोकांकरिता अंतर्दृष्टीच्या गोष्टी आणि मार्गदर्शन व दया आहे, त्या लोकांकरिता जे विश्वास राखतात.

(21) २१. काय त्या लोकांनी, जे वाईट कर्म करतात, असे समजून घेतले आहे की आम्ही त्यांना त्या लोकांसारखे ठरवू, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले की त्यांचे जगणे-मरणे एकसमान व्हावे. मोठा वाईट फैसला आहे, जो ते करीत आहेत.

(22) २२. आणि आकाशांना व धरतीला अल्लाहने अतिशय न्यायासह निर्माण केले आहे आणि यासाठी की प्रत्येक माणसाला त्याच्या कृत-कर्माचा पुरेपूर मोबदला दिला जावा आणि त्यांच्यावर जुलूम केला जाणार नाही.

(23) २३. काय तुम्ही त्यालाही पाहिले, ज्याने आपल्या मनाच्या इच्छेला आपला उपास्य (माबूद) बनवून ठेवले आहे आणि अल्लाहने जाणीवपूर्वक त्याला पथभ्रष्ट केले आहे आणि त्याच्या कानावर आणि हृदयांवर मोहर लावली आहे आणि त्याच्या डोळ्यांवर पडदा टाकला आहे, आता अशा माणसाला अल्लाहनंतर कोण मार्गदर्शन करू शकतो? काय अजूनही तुम्ही बोध ग्रहण करीत नाहीत?

(24) २४. आणि ते म्हणाले, आमचे जीवन केवळ याच जगाचे जीवन आहे, आम्ही मरण पावतो आणि जगतो आणि आम्हाला केवळ काळच मरण देतो. (वस्तुतः) त्यांना त्याचे काही ज्ञानच नाही, हे तर केवळ अनुमान आणि अटकळीचाच वापर करतात.

(25) २५. आणि जेव्हा त्यांच्यासमोर आमच्या स्पष्ट आयतींचे पठण केले जाते तेव्हा त्यांच्याजवळ या कथनाखेरीज कोणतेही प्रमाण नसते की जर तुम्ही सच्चे असाल तर आमच्या वाडवडिलांना घेऊन या.

(26) २६. (तुम्ही) सांगा की अल्लाहच तुम्हाला जिवंत करतो, मग तुम्हाला मृत्यु देतो, मग तुम्हाला कयामतच्या दिवशी एकत्रित करील, ज्याबाबत कसलीही शंका नाही, परंतु अधिकांश लोक हे जाणत नाहीत.

(27) २७. आणि आकाशांची व धरतीची राज्यसत्ता अल्लाहचीच आहे आणि ज्या दिवशी कयामत प्रस्थापित होईल त्या दिवशी असत्याचे पुजारी मोठ्या तोट्यात राहतील.

(28) २८. आणि तुम्ही पाहाल की प्रत्येक जनसमूह गुडघे टेकून पडला असेल. प्रत्येक समूह आपल्या कर्म-लेखाकडे बोलाविला जाईल. आज तुम्हाला आपल्या कृत-कर्माचा मोबदला दिला जाईल.

(29) २९. हा आहे आमचा ग्रंथ, जो तुमच्याविषयी खरे खरे बोलत आहे. आम्ही तुमची कर्मे लिहवून घेत होतो.

(30) ३०. तेव्हा, ज्यांनी ईमान राखले व जे सत्कर्म करीत राहिले१ तर त्यांना त्यांचा पालनकर्ता (अल्लाह) आपल्या दया - कृपेच्या सावलीत घेईल, हीच स्पष्ट सफलता आहे.
(१) इथेही ईमानासह सत्कर्माची चर्चा करून त्याचे महत्त्व सांगितले आहे. अर्थात सत्कमोशी अभिप्रेत असे कर्म जे पैगंबर आचरण शैलीनुसार केले जावे. असे कोणतेही कर्म नव्हे, ज्यास मनुष्य आपल्या मनाने चांगले समजून घेईल आणि ते नित्यनेमाने व मनापासून करील. उदाहरणार्थ, अनेक बिदआत (धर्मात दाखल झालेल्या नव्या गोष्टी) धार्मिक गटांमध्ये प्रचलित आहेत आणि ज्या त्यांच्या निकट अनिवार्य व आवश्यक धार्मिक कर्मांपेक्षाही जास्त महत्त्वाच्या आहे. यास्तव आवश्यक आणि पैगंबर आचरण शैलीनुसार आचरण सोडणे त्याच्या ठायी सर्वसामान्य बाब आहे, परंतु बिदअत अशी आवश्यक आहे की त्यात कसलीही सुस्ती करण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. वस्तुतः पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी त्यास सर्वाधिक वाईट काम सांगितले आहे.

(31) ३१. परतु ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला, तर (मी त्यांना फर्माविन) की काय माझ्या आयती तुम्हाला ऐकविल्या जात नव्हत्या? तरीही तुम्ही गर्व करीत राहिले आणि तुम्ही होतेच अपराधी लोक.

(32) ३२. आणि जेव्हा कधी सांगितले जात असे की अल्लाहचा वायदा निश्चितच खरा आहे आणि कयामतच्या येण्याबाबत कसलीही शंका नाही, तेव्हा तुम्ही उत्तर देत की आम्ही नाही जाणत कयामत काय आहे. आमच्या मनात असाच काही विचार येतो, परंतु आम्हाला खात्री नाही.

(33) ३३. आणि त्यांच्यावर त्यांच्या कर्मांचा वाईटपणा उघड झाला आणि ज्या गोष्टीची ते थट्टा उडवित राहिले, तिनेच त्यांना घेरले.

(34) ३४. आणि सांगितले गेले की आज आम्ही तुमचा विसर पाडू जसा तुम्ही आपल्या या दिवसाच्या भेटीचा विसर पाडला होता, तुमचे ठिकाण जहन्नम आहे आणि तुमची मदत करणारा कोणीही नाही.

(35) ३५. हे अशासाठी की तुम्ही अल्लाहच्या आयतींची थट्टा उडविली होती, आणि ऐहिक जीवनाने तुम्हाला धोक्यात टाकले होते तेव्हा आजच्या दिवशी ना तर ते (जहन्नममधून) बाहेर काढले जातील आणि ना त्यांच्याकडून लाचारी व बहाणा कबूल केला जाईल.

(36) ३६. तेव्हा सर्व प्रशंसा अल्लाहकरिता आहे, जो आकाशांचा व जमिनीचा, आणि सर्व विश्वांचा पालनकर्ता आहे.

(37) ३७. आणि समस्त (प्रशंसा व) महानता, आकाशांमध्ये व धरतीत त्याचीच आहे, आणि तोच वर्चस्वशाली आणि हिकमत बाळगणारा आहे.