51 - Adh-Dhaariyat ()

|

(1) १. शपथ आहे उडवून विखुरणाऱ्यां (वाऱ्यां) ची

(2) २. मग ओझे उचलणाऱ्यांची

(3) ३. मग धीम्या गतीने चालणाऱ्यांची

(4) ४. मग कामाची वाटणी करणाऱ्यांची.

(5) ५. निःसंशय, तुम्हाला जे वायदे दिले जातात (ते सर्व) खरे आहेत.

(6) ६. आणि निश्चितच न्याय होणार आहे.

(7) ७. शपथ आहे, मार्ग राखणाऱ्या आकाशाची.

(8) ८. निश्चितच तुम्ही विभिन्न गोष्टीत पडला आहात.

(9) ९. त्या (सत्या) पासून तोच फिरविला जातो, जो फिरविला गेला असावा.

(10) १०. अटकळीच्या गोष्टी बोलणारे नष्ट केले गेले.

(11) ११. जे चेतनाहीन आहेत आणि विसर पडलेले.

(12) १२. विचारतात की मोबदल्याचा दिवस केव्हा येईल?

(13) १३. (होय) हा तो दिवस आहे की हे आगीवर तापविले जातील.

(14) १४. स्वाद चाखा. हेच ते, ज्याची तुम्ही घाई माजवित होते.

(15) १५. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे जन्नतींमध्ये आणि (शीतल) झऱ्यांमध्ये असतील.

(16) १६. त्यांच्या पालनकर्त्याने जे काही त्यांना प्रदान केले आहे, ते घेत असतील ते तर त्यापूर्वीच सत्कर्म करणारे होते.

(17) १७. ते रात्री फार कमी झोपत असत.

(18) १८. आणि ते रात्रीच्या अंतिम प्रहरी (पहाटे) क्षमा - याचना करीत.

(19) १९. आणि त्यांच्या धन-संपत्तीत याचकांचा(मागणाऱ्यांचा)आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचा हक्क होता.

(20) २०. आणि विश्वास राखणाऱ्यांकरिता तर धरतीत अनेक निशाण्या आहेत.

(21) २१. आणि स्वतः तुमच्या अस्तित्वात देखील, तर काय तुम्ही पाहत नाहीत?

(22) २२. आणि तुमची आजिविका(अन्न सामुग्री) आणि जो तुम्हाला वायदा दिला जात आहे, सर्व आकाशात आहे.

(23) २३. तेव्हा आकाश आणि धरतीच्या स्वामी व पालनकर्त्याची शपथ! हे अगदी सत्य आहे, असेच खात्रीपूर्वक, जसे तुम्ही बोलता.

(24) २४. काय तुम्हाला इब्राहीम (अलैहिस्सलाम) च्या सन्मानित अतिथींची वार्ताही पोहचली आहे?

(25) २५. ते जेव्हा त्यांच्याजवळ आले तेव्हा सलाम केला. (इब्राहीम) यांनी सलामला उत्तर दिले (आणि म्हणाले, हे तर) अनोळखी लोक आहेत.

(26) २६. मग (गुपचुप घाईघाईने) आपल्या कुटुंबियांकडे गेले आणि एका लठ्ठ वासरुचे (मांस) घेऊन आले.

(27) २७. आणि ते त्यांच्या पुढे ठेवले आणि म्हणाले, तुम्ही खात का नाही?

(28) २८. मग मनातल्या मनात त्यांच्यापासून भयभित झाले. (अतिथी) म्हणाले, तुम्ही भिऊ नका आणि त्यांना (हजरत) इब्राहीमला एका ज्ञानी पुत्रप्राप्तीची शुभवार्ता दिली.

(29) २९. तेव्हा त्यांच्या पत्नीने आश्चर्यचकित होऊन आपल्या तोंडावर हात मारून म्हटले की मी तर म्हातारी आहे, त्याचबरोबर वांझ देखील.

(30) ३०. ते म्हणाले की होय, तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने असेच फर्माविले आहे. निःसंशय, तो हिकमशाली आणि जाणणारा आहे.

(31) ३१. (हजरत इब्राहीम अलै.) म्हणाले की अल्लाहने पाठविलेल्या (फरिश्त्यां) नो! तुमच्या (येण्याचा) हेतू काय?

(32) ३२. त्यांनी उत्तर दिले की आम्ही अपराधी लोकांकडे पाठविले गेलो आहोत.

(33) ३३. यासाठी की आम्ही त्याच्यावर (भाजलेल्या) मातीच्या दगडांचा वर्षाव करावा.

(34) ३४. जे तुमच्या पालनकर्त्यातर्फे चिन्हांकित झाले आहेत त्या मर्यादा भंग करणाऱ्यांकरिता.

(35) ३५. तेव्हा जेवढे ईमान राखणारे तिथे होते, आम्ही त्यांना तेथून काढले.

(36) ३६. आणि आम्हाला तिथे मुसलमानांचे फक्त एकच घर आढळले.

(37) ३७. आणि आम्ही तिथे त्यांच्यासाठी, जे दुःखदायक शिक्षा यातनेचे भय बाळगतात, एक पूर्ण चिन्ह सोडले.

(38) ३८. आणि मूसाच्या वृत्तांतात (ही आमच्यातर्फे तंबी आहे) जेव्हा आम्ही त्यांना फिरऔनकडे स्पष्ट प्रमाणासह पाठविले.

(39) ३९. तेव्हा त्याने आपल्या सामर्थ्याच्या घमेंडीत तोंड फिरविले, आणि म्हणाले, हा (एकतर) जादूगार आहे किंवा वेडसर आहे.

(40) ४०. शेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या सैन्याला आपल्या शिक्षा-यातनेत धरून, समुद्रात टाकले. तो होताच निर्भर्त्सना करण्यायोग्य.

(41) ४१. त्याचप्रमाणे आदच्या लोकांमध्येही (आमच्यातर्फे तंबी आहे) जेव्हा आम्ही त्यांच्यावर वांझ (अशुभ) वादळ पाठविले.

(42) ४२. ते ज्या ज्या वस्तूवरून गेले, तिला जीर्ण हाडांप्रमाणे चूरेचूर करून टाकले.

(43) ४३. आणि समूद (च्या वृत्तांता) मध्येही (बोध) आहे, जेव्हा त्यांना सांगितले गेले की तुम्ही काही दिवसापर्यंत लाभ प्राप्त करून घ्या.

(44) ४४. परंतु त्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाचे पालन केले नाही, ज्याबद्दल त्यांना एका भयंकर गर्जनेने नष्ट करून टाकले आणि ते बघतच राहिले.

(45) ४५. मग ना तर ते उभे राहू शकले, आणि ना सूड घेऊ शकले.

(46) ४६. आणि नूह (अलै.) यांच्या जनसमूहाची देखील याच्या आधी (हीच अवस्था झाली होती) ते देखील मोठे अवज्ञाकारी लोक होते.

(47) ४७. आणि आकाशाला आम्ही (आपल्या) हातांनी बनविले आहे आणि निःसंशय, आम्ही व्यापक करणारे आहोत.

(48) ४८. आणि जमिनीला आम्ही बिछाईत बनविले आहे, तेव्हा आम्ही किती चांगले बिछाईत करणारे आहोत.

(49) ४९. आणि प्रत्येक वस्तूला आम्ही जोडी जोडीने निर्माण केले आहे,१ यासाठी की तुम्ही बोध ग्रहण करावा.
(१) अर्थात प्रत्येक वस्तूची जोडी, जसे नर-मादी, किंवा विरुद्धार्थानेही निर्माण केले आहे. जसे अंधार-उजेड, जल-थल, चंद्र-सूर्य, गोड-कडू, रात्र-दिवस, भले-बुरे, जीवन-मृत्यु, ईमान-कुप्र, सौभाग्य-दुर्भाग्य, जन्नत-जहन्नम, जिन्न-मनुष्य वगैरे. येथपावेतो की सजीवांच्या तुलनेत निर्जीव. यास्तव या जगाचीही जोडी आहे ते म्हणजे आखिरत.

(50) ५०. तेव्हा तुम्ही अल्लाहकडे धाव घ्या. निःसंशय, मी तुम्हाला त्याच्यातर्फे खबरदार करणारा आहे.

(51) ५१. आणि अल्लाहसोबत दुसऱ्या कोणालाही उपास्य (दैवत) बनवू नका, निश्चितच, मी तुम्हाला त्याच्यातर्फे स्पष्टतः सावध करणारा आहे.

(52) ५२. अशाच प्रकारे जे लोक त्यांच्या पूर्वी होऊन गेलेत, त्यांच्याजवळ जो देखील पैगंबर आला, त्याला ते म्हणाले की एकतर हा जादूगार आहे किंवा वेडा!

(53) ५३. काय हे, या गोष्टीची एकमेकांना ताकीद करत गेलेत, नव्हे, किंबहुना हे सर्व विद्रोही (उन्मत्त) लोक आहेत.

(54) ५४. तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून तोंड फिरवून घ्या, तुमच्यावर कसलाही दोषारोप नाही.

(55) ५५. आणि उपदेश करीत राहा, निःसंशय हा उपदेश ईमान राखणाऱ्यांना लाभ देईल.

(56) ५६. मी जिन्नांना आणि मानवांना फक्त अशासाठी निर्माण केले आहे की त्यांनी केवळ माझी उपासना करावी.१
(१) यात अल्लाहच्या त्या इराद्यास जाहीर केले गेले आहे, जो शरिअतीनुसार तो आपल्या दासांकडून इच्छितो की समस्त जिन्न आणि मानवांनी केवळ एक अल्लाहचीच उपासना करावी व आज्ञापालनही त्याच एकाचे करावे. जर याचा संबंध उत्पत्तीच्या इराद्याशी असता तर सर्वच त्याची उपासना व आज्ञापालन करण्यास विवश झाले असते, मग कोणी अवज्ञा करण्याचे सामर्थ्य राखू शकला नसता. अर्थात यात जिन्न आणि मानवांना त्याच्या जीवन उद्देशाची आठवण करून दिली गेली आहे, ज्याचा त्यांनी विसर पाडल्यास आखिरतमध्ये सक्तीने विचारपूस होईल. परिणामी ते त्या कसोटीत असफल ठरतील, ज्यात अल्लाहने त्यांना संकल्प आणि पसंतीचे स्वातंत्र्य देऊन ठेवले आहे.

(57) ५७. त्यांच्याकडून मी ना आजिविका (रोजी) इच्छितो ना असे इच्छितो की त्यांनी मला खाऊ घालावे.

(58) ५८. निःसंशय, अल्लाह स्वतः रोजी देणारा सामर्थ्यशाली व बलवान आहे.

(59) ५९. तेव्हा ज्या लोकांनी अत्याचार केला आहे, त्यांनाही त्यांच्या साथीदारांच्या हिश्श्याइतकाच हिस्सा मिळेल, यास्तव त्यांनी माझ्याशी घाईने मागू नये.

(60) ६०. तेव्हा दुर्दशा आहे काफिरांसाठी, त्यांच्या त्या दिवशी ज्याचा त्यांना वायदा दिला जात आहे.